Friday, January 5, 2024

कोंकणच्या मुळावर उठणाऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय?

उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे.

कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सागरी महामार्गाचा 'विकास' करून त्याचे सहा पदरी महामार्गात रूपांतर करण्याची योजना जाहीर झाली आहे. त्याबद्दल विचारमंथन करणारे हे दोन लेख ........

कोंकणच्या मुळावर उठणाऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय?

      रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे एकत्र होते आणि एकाच रत्नागिरी या नांवाने ओळखले जात होते तेव्हापासून कोंकणी माणूस एक भव्य स्वप्न पहात आला. ते स्वप्न एका रस्त्याचे होते. तो रस्ता मुंबईच्या खाडीच्या दक्षिण किनाऱ्यावर असणाऱ्या रेवस या गांवापासून निघून अरबी समुद्राच्या कडेकडेने दक्षिणेकडे जाऊन वेंगुर्ले तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या रेडी या गांवी पोहोचणार होता. म्हणून त्याला 'रेवस-रेडी रस्ता' म्हणत. ते स्वप्न पाहणाऱ्या कोंकणवासीयांच्या त्यावेळी अगदी माफक अपेक्षा होत्या, रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात गांवे असणाऱ्या चाकरमान्यांना रेवसपर्यंत गेलो की खाडीपलिकडे मुंबई असे वाटत होते; आणि शिक्षक, कारकून म्हणून जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या जिल्हावासीयांना आपापल्या गांवी जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार अशी आशा वाटत असे. कारण हे लोक कुडाळ-वेंगुर्ल्याकडच्या मूळ गांवातून दापोली- मंडणगडकडे नियुक्त्या झालेले होते, आणि खेड-चिपळूण- मंडणगड-गुहागरचे कणकवली-कुडाळ-देवगड-सावंतवाडी तालुक्यात नेमले गेले होते.

    प्रत्यक्षात मात्र, साठच्या दशकात घोषित झालेला रस्ता तयार होण्यापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे दोन जिल्हे तयार झाले. नोकरीच्या गांवाहून मूळ गांवी जाण्याच्या गरजेचा प्रश्नच संपुष्टात आला. तरीही कांसवगतीने का होईना, 'रेवस रेडी मार्गा'चं प्रकरण 'मार्गा'ला लागत राहिले. तो रस्ता 'राज्य महामार्ग' म्हणून घोषित करण्यात आला, त्याला '' हा क्रमांक देण्यात आला. 'सागरी महामार्ग' असे नामकरणही झाले. आता हा महामार्ग आणखी नव्या टप्प्यावर आला आहे. केवळ टप्प्यावर येऊन थांबला नाही, तर सध्या 'तारीख पे तारीख' घेत बसलेल्या बहुचर्चित मुंबई गोवा महामार्गाबरोबर स्पर्धा करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. त्याचे सहापदरी महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याने जुने मराठमोळे नांव टाकून नवे आधुनिक आणि स्टायलिश असे 'ग्रीनफिल्ड' हे नांव त्याने धारण केले आहे. पंचवीस हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. इतकी प्रगती झाल्यावर 'कोंकण विकास- कोंकण विकास' म्हणतात तो आणखी काय व्हायचा असेही कुणाला वाटू शकते. इतकी सगळी पुढची वाटचाल झाल्यामुळे, एक भला रुंद चार पदरी राष्ट्रीय महामार्ग विकसित होत असताना त्याहून दोन जास्त मार्गिका असणाऱ्या नव्या महामार्गाची काय जरूर आहे हा प्रश्नच बाजूला पडून गेला.

     'रेवस-रेडी' आणि 'सागरी महामार्ग' अशा दोन नावांनी ओळखला जाण्याच्या काळात या रस्त्याचे बांधकाम कधीच पूर्ण झाले नाही. आज तो रस्ता रेडी ते जयगड एवढाच सलग आहे. त्यानंतर लागणाऱ्या खाड्यांवर पूल झालेले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात जयगड-तवसाळ, धोपावे-दाभोळ आणि केळशी असे तीन, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांच्या मध्ये असणाऱ्या बाणकोटच्या खाडीवर एक आणि रायगड जिल्ह्यात दिघी आगरदांडा दरम्यान एक असे पांच पूल होणे बाकी आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा अर्धवट राहिलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी योजना आखली आणि राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना ती जाहीर केली होती. त्यानुसार  हा सलग रस्ता तयार होण्याची आशा निर्माण झाली. त्या योजनेप्रमाणे हा रस्ता सध्या आहे तेवढ्याच म्हणजे दोनच मार्गिकांचा राहणार होता. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगत असणाऱ्या 'स्टेट कोस्टल हायवे'च्या धर्तीवर त्याची उभारणी व्हायची होती. त्या रस्त्याचा किनाऱ्याशी समांतर, नागमोडी वळणांचा, चढ उतारांचा आणि झाडीतून जाणारा दुपदरी पट्टा निसर्गाशी एकरूप होऊन गेला आहे. ती एकरूपता या नव्या योजनेने नष्ट होणार आहे. विशेष म्हणजे अजितदादांसह ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपदावर असणारी बरीच मंडळी या सरकारातही मंत्री पदांवर आहेत. मात्र घडते आहे त्यात काहीतरी विसंगती आहे असे कुणाला वाटत नाही. सहा पदरी रस्त्याच्या बांधणीचे निकष पाहता मुंबई गोवा रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या नांवाने झाली त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वृक्षतोड होण्याची भीती आहे. कोंकणपट्टीच्या दोन बाजूंनी जाणाऱ्या दोन महामार्गांच्या कडेची झाडे अशी तोडली की कोंकणात येणाऱ्या लोकांनी काय पहायचे? आणि आधीच अधिवास नाहीसा झालेल्या असंख्य प्राण्यांनी मंत्र्यांच्या वसाहतीत जाऊन राहायचे काय?

     एवढे करून सहा पदरी रस्ता बांधला तर तो कोकणवासीयांना किती लाभदायक ठरणार याचे गणित काही नाही. वाढत्या वाहन संख्येवर अनेक पदरी रस्ता हा प्रभावी उपाय असल्याची अनेकांची समजूत आहे, पण ती बरोबर नाही. रस्त्यावरील मार्गिकांची संख्या वाढविल्याने वाहतुकीची कोंडी होत नाही हे प्रमेय बरोबर असते तर पूर्वीच्या तिप्पट मार्गिका झालेल्या मुंबई पुणे जलदगती महामार्गावर सुट्टीच्या दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या नसत्या. कोंकण भूमी ही कित्येक शतकांची परंपरा असलेली, स्वतःची संस्कृती असलेली, निसर्गावर प्रेम करणाऱ्या आणि त्याची जपणूक करणाऱ्या माणसांची आणि बाहेरून येणाऱ्याला प्रेमात पाडणारी भूमी आहे. परंतु 'कोंकण रेल्वे'ने ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणाऱ्या 'ट्रेस पासर्स'ची भूमी बनवली. मुंबई गोवा महामार्गाचे अनेक वर्षे रखडलेले काम पूर्ण झाल्यावर तो रस्ताही 'ट्रेस पासिंग'साठी जास्त वापरला जाणारा आहे. त्यात आता आणखी एका अनावश्यक रुंदपणाची भर पडणार आहे. हे कशासाठी असा प्रश्न विचारून कोंकणच्या मुळावर उठणारा हा अनेक पदरी मार्ग नको असे स्पष्ट सांगण्याची वेळ आली आहे.

राजेंद्रप्रसाद स. मसुरकर


 उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे.

                सागरी महामार्ग अर्थात ग्रीन फिल्ड हायवेची घोषणा चारपाच महिन्यांपूर्वी झाली, खरतर एव्हाना या चारपदरी महामार्गाचा आराखडाही तयार झाला असेल. निविदा निघून त्या वितरितही झाल्या असतील. हा लेख लिहायला उशिरही झाला असेल कदाचित ; मात्र चर्चेला उशिर झालेला नाही अथवा गरजही संपलेली नाही.

             सहापदरी महामार्गाची गरज आहे का पर्यटक या सागरी महामार्गाकडे का वळतायत ? या मार्गाची बलस्थानं काय आहेत ? संपूर्णपणे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने जाणाऱ्या सध्याच्या महामार्गात काय दोष आहेत ? हा महामार्ग नव्याने बांधताना काही वेळमर्यादा आखली आहे का ? बांधकामावेळी कोणती नियामके सरकार विचारात घेणार ? कोकणच्या दंतुर किनाऱ्याचा आणि भौगोलिक रचनेचा किती विचार या आरेखना वेळी केला गेलाय ? ग्रीन फिल्ड शब्दशः राहील का ? अप्रतिम निसर्गसौन्दर्य लाभलेल्या कोकणाचं हे वैशिष्टय हा महामार्ग बांधताना विचारात घेतलं जाईल का ? पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करतानाचे निकष हा रस्ता तयार झाल्यावरही तसेच लागू होण्यासारखी परिस्थिती असेल का ? या प्रश्नांचं काय !!!

                खरंतर स्थानिक जनतेच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि पत्रकारांनी सरकारला विचारावयाचे हे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. पण या दोन्ही घटकांनी सरकारला खरच हे प्रश्न विचारलेत का ? मुळात त्यांना या प्रश्नांचं महत्व जाणवतंय का ? हा एक मोठा प्रश्न आहे. नाही म्हणायला काही हाताच्या बोटावर मोजण्याएव्हढे पत्रकार आणि बोटंसुद्धा लाजतील एवढे लोकप्रतिनिधी हे प्रश्न उपस्थित करू पाहतायत. पण अर्थातच उदघाटनं आणि पक्षाच्या कामात व्यस्त असणाऱ्या मंत्र्यांना या कडे लक्ष द्यायला वेळ नाही.

                या प्रश्नांची उत्तर शोधण्याकरता म्हणा किंवा हे वास्तव आणि हे प्रश्न नव्याने लोकप्रतिनिधींसमोर अन जनतेसमोर मांडण्याकरता हा लेखनप्रपंच..

कोकणाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला निसर्ग, राखलेल्या देवराया, निळाशार समुद्र, पांढऱ्या काळ्या लाल वाळूचे  दंतूर किनारेवेगळ्या धाटणीची, कौलारू घरं आणि देवळं , डोंगराच्या कुशीतून फिरणारे वळणावळणाचे रस्ते, अलिबाग पासून अगदी पार गोव्यापर्यंत दिसणारे अरुंद पण सुंदर पुल. कोकणात पर्यटक येतात ते मुळात हे सगळं निसर्गसौन्दर्य बघण्यासाठी. दहा बारा वर्षांपूर्वी पर्यंत हे सगळं बघायला मिळतही होतं . मुंबई - गोवा रस्ता अथवा लोहमार्ग कुठूनही या तुम्हाला कोकण बघायला मिळणार असं खात्रीने सांगता येत होतं. पुढे मुंबई - गोवा महामार्गाचं सहापदरीकरण करण्याचं मा. गडकरी महोदयांच्या मनात आलं सवयीप्रमाणे ते कागदावर आणि पुढे जमिनीवरही उतरलं. अन तिथून सुरु झाली कायमच उपेक्षित असण्याऱ्या कोकणी लोकांची ससेहोलपट. (याला मा.  गडकरी जबाबदार आहेत असं मी म्हणत नाहीये हो, राग सरकारवर आहे वैयक्तिक नव्हे.) २०१३ साली सुरु झालेला मुंबई गोवा महामार्ग गेली दहा वर्ष तयार होतोय, ३१ डिसेंबर २०२४ ला पूर्ण होणार असं नेहमीचं प्रतिज्ञापत्र परत संगणकाने न सांगताच टाईप करून कोर्टात सादरही केलंय.

एक मोठ्ठा रुंद महामार्ग आधीच कोकणातून जात असताना आणखी नवीन सागरी महामार्गाची उठाठेव कशासाठी ? कोकणातलं पर्यटन वाढावं लोकांना कोकणात येणं सोयीस्कर व्हावं म्हणून हा मार्ग रुंद केला तो पूर्ण झाला की पर्यटन वाढणार. पण मग सगळं ट्रॅफिक त्या मार्गाने येणार असेल आणि कितीही ट्रॅफिक झेलण्याची क्षमता त्या मार्गाची असेल तर मग सागरी महामार्गाच्या सहापदरीकरणाचा हट्ट कशासाठी ? सहापदरीकरण करणार म्हणजे काय करणार तर आताच मार्ग जेवढा आता आहे तेवढाच बाजूला बांधणार किंवा रुंद करणार म्हणा. नाही ही तुमची आमची सामान्य जनतेची समजूत पण सहापदरीकरण करताना एवढंच केलं जात नाही तर वळणं कमी केली जातात, वळणांची तीव्रता कमी केली जाते, बाजूला ट्रक स्टॉप, टोल, दुकानं हे सगळं बांधलं जातं आणि मग हे करण्यासाठी फोडले जातात डोंगर, दरी भरली जाते. बर सरळसोट समृद्धी महामार्गावरचं अपघाताचं प्रमाण सरकारनं अभ्यासलं असेलच किमान त्यातून तरी धडा घ्याल की नाही ?

गेल्या पाच सहा वर्षांत सागरी महामार्गाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं, कूर्मगतीने चालू असलेलं काम आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सोशल मिडिया मुळे प्रकाशात आलेला कोंकणाचा सागरतट अन सागरी मार्ग. या मार्गाने कोंकणात येणं प्रत्यक्षदर्शी जरी वेळखाऊ असलं तरी या मार्गाने प्रवास करताना दिसणाऱ्या खऱ्या, दुर्गम कोंकणच्या प्रेमात पडून पर्यटक हा मार्ग निवडतात. हे या मार्गाचं प्रमुख बलस्थान आहे ते टिकलं पाहिजे असं स्थानिक लोकप्रतिनिधींना का वाटत नाही ?

सागरी महामार्गाचा विचार केला तर बराच भाग हा किनाऱ्याने जातो मग किनाऱ्याकडे वाढवणं शक्य नाही. मग बाजूचे डोंगर फोडणार. एका बाजुला सुंदर निळा समुद्र, काळी-लाल-पांढरी वाळू तर दुसऱ्या बाजुला जैवविविधतेने संपन्न असे विस्तीर्ण सडे  आणि गर्द झाडांनी भरलेले डोंगर. कोकणाची सगळी वैशिष्ट्य ठासून भरलीयत या मार्गावर. आणि त्यातली महत्वाचे डोंगर झाडं सडे तुम्ही नष्ट करताय ? का ? कोकणावर राग का एवढा ? नवीन झाडं लावली जातील असं प्रतिज्ञापत्र करणं सोपं आहे. पण खरच झाडं लावली का आणि लावलीच तर कोणती लावली हे बघायला कोर्ट प्रत्यक्ष प्रवास करणार नाहीच. ते फक्त कागद बघणार. रस्ता बांधण्यासाठी झाड तोडावं लागत नाही हे सरकार ला का कळत नाही ? खरंच प्रत्येक रस्ता चार पदरी करायला हवाच का ? रस्ता गुळगुळीत करून भागणार असेल तर तो रुंद का करायचा ? काही ठिकाणी शहराच्या भागात रस्ता रुंद करायला हवा हे अगदी मनापासून मान्य. पण तोच नियम प्रत्येक इंचाला लावण्याचा अट्टाहास सरकार कधीच सोडणार नाही का ? प्रवासासाठी सगळ्यात सुंदर मानले जाणारे भारतातले किंवा जगातले दहा मार्ग सरकारने एकदा स्वतः गाडी चालवून बघावेत त्यांचं खरं सौन्दर्य कशात आहे हे बघावं. लांब कशाला एकदा बावनदी - देवरुख रस्ता बघावा. सागरी महामार्ग तसा करणार असाल ना तर मी हा लेख जाहीरपणे मागे घेईन.

या ‘सुंदर’ महामार्गाची भुरळ सगळ्या पर्यटकांना पडतेय, ‘मुंबई गोवा’च्या लांबलेल्या कामामुळे हा सागरी महामार्ग उजेडात आला. या मार्गावरची रहदारी वाढली पण तिथल्या असुविधा मात्र कमी झाल्याचं नाहीत. खडबडीत रस्ते, गाव आहे म्हणून बांधलेले गतिरोधक; अहो २५ किलोमीटर मध्ये ४० याला तुम्ही महामार्ग दर्जा दिलायत, फार कमी ठिकाणी असलेली वाहतूक चिन्हं. कोकण पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. पण जर हे महामार्ग कोकणच्या वैशिष्ट्यांचा जीवावर उठणार असतील तर असे महामार्ग काय कामाचे ? आम्हाला आमचे मार्ग असेच वळणावळणाचे, झाडांच्या सावलीतून जाणारे हवेत. अहो गोव्यात आमच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दहा पट पर्यटक दर महिन्यात येत असतात तिकडे तर त्यांनी सहा पदरी रस्ते बांधायला हवेत मग. पण ते नाही बांधत कारण त्यांना पर्यटक काय बघायला अनुभवायला येतात हे कळलंय, एक्सप्रेसवे वरून वेगात निघून जाताना बाजूचा निसर्ग दिसत नसेल तर कसलं डोंबलाचं पर्यटन विकसित होणार. सध्याचा वळणावळणाचा रस्ता वेगात जाणाऱ्या लोकांसाठी धोकादायक असेल कदाचित पण ह्यावरून जाताना जो निसर्ग बघायला मिळतो, जे फोटोजेनिक लोकेशन्स दिसतात ते तुमच्या एक्सप्रेसवे नंतर शिल्लक राहतील याची शक्यता शून्य आहे हे आम्हाला आता स्वच्छ दिसतंय.

बर सध्या ज्या भारताची जगभरात वाहवा होतेय भारताचं upi बऱ्याच देशात चालतंय, डॉलर ऐवज रुपी मध्ये व्यवहार होण्याइतपत देश पुढे गेलाय. तर मग रस्ते बांधण्याचं अमेरिकन अथवा आंतरराष्ट्रीय नियामक आपण का पाळायचं ? आपलं स्वतःचं भारतीय रस्ते नियामक असायला काय हरकत आहे ? अहो तिकडचा भूगोल वेगळा इकडचा वेगळा, मी तर फार लांबचं म्हणतोय अगदी महाराष्ट्राचंच बोलायचं तरी विदर्भ, खान्देश, कोंकण ह्या तिन्हीचे भूगोल वेगवेगळे आहेत. तुम्ही कोकणासाठी वेगळे नियम बनवा ना. रस्ता आखणी करताना त्या भागातलं  पर्यावरण व भूगोल आधी अभ्यासायचं हे आपण कधी शिकणार. कोकणात सगळ्यात जास्त पाऊस डोंगर उतारावर पडतो (अरबी समुद्रावरून येणारे ढग डोंगराला अडकतात) आणि तेच पाणी डोंगरात जिरून मग डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांना वर्षभर पुरतं. वळणं कमी करण्याच्या उद्योगापायी आपण जर डोंगरच नष्ट केलेत तर त्या गावांना पाणी कुठून पुरवायचं ? कित्येक ओढ्यांचा, वहाळांचा, नैसर्गिक झऱ्यांचा उगम ह्या डोंगरांत असतो, ते झरे बाजूच्या गावांना पाणी पुरवत असतात; त्यांचा मार्ग मोडण्याचा अधिकार नाहीय ना तुम्हाला. रस्त्याकडेला असलेली झाडं ही शंभरदोनशे वर्ष जुनी वड, पिंपळ, गुलमोहराची झाडं आहेत. ती नुसतीच उभी नाहीयेत हो; पाच-सहा तास प्रवास करून दमलेल्या पर्यटकांना आणि त्यांच्या गाडीला सावलीसुद्धा देतात. अन त्या सावलीची सर हॉटेल मधल्या पार्किंगला यायची नाही. अहो ह्याच सावलीसाठी तर मुंबई पुण्याचे आयटी वाले कोंकणात येतात ना ? कोंकणाचं हे सौन्दर्य समजून घ्यायचंच नाहीय का ?

                कोंकण जेवढं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तेव्हढंच किंबहुना जास्तच प्रसिद्ध आहे इथल्या मासळी साठीहा जो प्रस्तावित महामार्ग आहे तो ज्या भागांतून जातो तिथे मासेमारीसाठी प्रसिद्ध असणारी किमान दहा - पंधरा बंदरं आहेत. ज्या बंदरांमध्ये मासेमारीच्या लाँचेस उभ्या असतात. मोठ्या प्रमाणात व्यवहार आणि मासेमारी तिथे चालते. ह्या बंदरांच्या दोन्ही तीरांना जोडणारे सध्याचे पूल अरूंद आहेत, त्यामुळे त्यांचं रुंदीकरण अटळ आहे. मग ह्या नवीन पुलांच्या बांधणीवेळी इथल्या बोटी कुठे ठेवायच्या ? बंदरातल्या जेटीवर चालणाऱ्या मास्यांच्या व्यवहाराचं काय ? दोन दोन वर्ष चालणाऱ्या पुलांच्या कामामुळे तिथल्या भागात जे बांधकामाचं सामान पडून जलप्रदूषण होईल त्याला जबाबदार कोण असणार ? आणि त्यावर उपाय सरकारला दिसतोय का ? बर तुम्ही हा मोठ्ठा रस्ता करताना बाजूचं सगळं भुईसपाट करणार. आणि मग तिथे मोठाली महागडी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणार अहो मग इतकी वर्ष रस्त्याकडेला व्यवसाय करणाऱ्या आमच्या कोकणातल्या लोकांनी काय करायचं ? त्यांची अंगणातून तुम्ही रस्ते नेणार आणि त्यांचे व्यवसाय पण खाणार. याला काय अर्थ नाही ना साहेब..

समर्थक म्हणतात रस्ता व्हायला वेळ लागला पण रस्ता किती उत्तम झालाय बघा. ठीक आहे अहो झाला असेल सुंदर पण त्याला दहा वर्ष लागली न त्याचं काय ? बर अजूनही पूर्ण झालेला नाही होआणि उत्तम तर अजिबात नाही; चांगला झालाय असं म्हणू हवंतर.

रस्ता नको असं आम्ही म्हणतच नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की…  रस्त्याच्या दोन्ही बाजूस एकेक suv उभी असताना रस्त्यावरून दोन बस गाडया ( व्होल्वो बस नव्हेत ) बाजूबाजूने सहज जातील इतपत रुंद रस्ता असावा, रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण सावली असावी , गावातून जाणाऱ्या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन तीन फूट रुंद साईड पट्टी असावी, रस्ता पूर्णपणे खड्डे विरहीत, पुरेसं डांबर वापरून केलेला आणि गुळगुळीत असावा, रस्त्यावर व्यवस्थित वाहतूक चिन्ह असावीत. बस्स एवढ्याच माफक अपेक्षा आहेत आमच्या.

या निवडणूक वर्षात मत मागायला फाटकातून आत यायच्या आधी ह्या प्रश्नांची उत्तरं शोधून ठेवा म्हणजे झालं….

श्रीरंग मसुरकर



कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...