Wednesday, November 21, 2018

सुंदर मी होणार


सुंदर मी होणार’ हे पु. . देशपांडे यांनी लिहिलेलं, गाजलेलं नाटक. ५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतल्या प्राथमिक फेरीच्या चौथ्या दिवशी (२० नोव्हेंबर २०१८) रत्नागिरीतल्या खल्वायन संस्थेनं ते सादर केलं. त्या नाटकाचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेला हा परिचय...
नार ........

सुंदर मी होणारया नाटकातील एक प्रसंग. (फोटो : वैभव चंद्रकांत दाते)

स्वातंत्र्यानंतर संस्थानं भारतात विलीन झाल्यानंतरचा काळ. नंदनवाडीच्या संस्थानिकांचा भव्य राजवाडा अजूनही जुन्या काळाची अदब अन् मुजरे सांभाळत बसलाय. महाराजांची थोरली मुलगी दीदीराजे गेली १० वर्षं खुर्चीला खिळून बसलीय. संस्थानाचे खास डॉक्टर तिच्यावर औषधोपचार करतात. राजेंद्र, प्रसाद आणि बेबीराजे ही तिची भावंडं.

१० वर्षांच्या पांगळेपणामुळे खुर्चीला जखडलेल्या दीदीला आपण बरं होण्याची आशाच उरलेली नाही. २६-२७ वर्षांच्या त्या तरुणीला मृत्यूच आपली सुटका करील, असं खात्रीनं वाटू लागलंय. कवी गोविंदांच्यामृत्यू म्हणजे वसंत माझायांसारख्या कविता तिला आवडू लागल्यात. ती स्वतः सुंदर कविता रचते. निसर्गाच्या सौंदर्याच्या दर्शनाला पारखी झालेली दीदी कित्येक वर्षांपूर्वी तिच्या आईनं संस्थानातल्या लोकांसमवेत केलेल्या दीपदानाच्या रम्य सोहळ्याची स्मृती डोळ्यांपुढे आणते. पावसानं दुथडी भरून वाहणाऱ्या कल्याणी नदीचं पाहून आलेलं दृश्य बेबी स्वतःच्या कल्पनेनं अनुभवू लागते.

दीदी तर अधू; पण त्या वाड्यातल्या कुणालाच त्या चार अवाढव्य भिंतींच्या बाहेर जाता येत नाही. संस्थानाची अमर्याद सत्ता गमावलेल्या महाराजांचा कडकपणा वाढलाय. आपल्या राज्यात घोड्यांचा लगाम धरून अदबीनं उभं राहणाऱ्या मोतद्दाराचा मुलगा बंडा सावंत निवडणूक लढवून असेम्ब्लीचा सदस्य बनलाय, हे महाराजांना सहन होत नाही. लोकशाहीच्या नावानं सामान्य माणसाच्या हाती सत्ता जावी, हे त्यांना मंजूर होत नाही

योगायोग असा, की याच बंडा सावंतवर धाकट्या मुलीचं-बेबीचं प्रेम आहे; पण महाराजांना तो व्यभिचार वाटतो. तिकडे दीदीच्या कविता आवडलेला एक कवी - संजय देशमुख - एकदा तिला भेटायला वाड्यात येतो. तिच्या नकळत तिच्या कविता बेबीनं कवीला पाठवलेल्या असतात. कुणावरती प्रेम केलं, तर उत्कटतेनं करावं, असं कवीचं तत्त्व. खुर्चीला खिळलेल्या दीदीवर तो मनापासून प्रेम करतो; पण तो तिथं आलाय हे कळताच महाराज येतात आणि त्याला हाकलून लावतात. त्यांचा हुकूम ऐकताच एकाएकी अवसान येऊन दीदी खुर्चीतून उठते, उभी राहते. ‘जुनी इंद्रिये, जुना पिसारा, सर्व सर्व झडणार, सुंदर मी होणारअसं काव्य तिला स्फुरतं

दीदी आता चालण्याचा सराव करते; पण ती बरी होत आहे, हे महाराजांना मान्य होत नाही. दरम्यान, त्यांची पुतणी - एका लक्षाधीशाबरोबर लग्न केलेली - भेटीला येते. तिचा नवरा सुरेश हा सुरांच्या आनंदात डुंबणारा; पण बाथटबमध्ये बसल्यासारखं घराच्या उंच भिंतींच्या आत गीतांचा आनंद घेण्याची त्याला आवड. निरनिराळे राग आळवीत तोआसावरीरागाशी दीदीची तुलना करतो.

महाराजांचा कठोरपणा वाढत जातोय. ते मुंबईला गेलेले असतात. तिथून पत्र पाठवून इंग्लंडला जाऊन दीदीवर उपचार करण्याचा बेत प्रकट करतात. त्या वेळी मुलांची आई - संस्थानची राणी - मृत्युपंथाला लागलेली असताना तिच्या काळजीपोटी स्वतःचं ठरलेलं लग्न रद्द करून आयुष्यभर मुलांची आई होऊन राहण्याचं व्रत घेतलेले डॉक्टर आत्मकहाणी सांगतात
इतरांच्या बाबतीत कठोर असणारे आपले वडील आपल्यावर प्रेम कसे करतात याचं दीदीला आश्चर्य वाटत असतं; पण एकेक करून भावंडं आणि डॉक्टर वाडा सोडून जाऊ लागतात आणि आपल्या आईवरचं प्रेम नाहीसं झाल्यावर तिला ही मुलं झाली, हे कळताच वडिलांच्या कठोर मनाची चीड येते

दीदीला पाहिल्यावर सुरांच्या मागून जाण्यासाठी घराच्या भिंतीबाहेर पडणारा सुरेश पुन्हा एकदा सपत्नीक भेटायला येतो. आता सुरेशरूपी सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असतं. तो मुक्तपणे गाऊ लागतो. ते स्वर कानी पडल्यानं संतापलेले महाराज येऊन त्याला हाकलून लावतात.

आता मात्र महाराजांच्या या हुकूमशाही आणि हृदयशून्य वागणुकीची चीड येऊन संपूर्ण आयुष्य वडिलांच्या सुखासाठी त्यांच्या सोबत घालवण्याचं ठरवलेली दीदी वाड्याबाहेर पडते. तिच्या पावलांत बळ आलेलं असतं. तिला नवे पंख फुटलेले असतात
पुलंच्या समर्थ लेखणीतून प्रकटलेलं हे नाटक मनोहर जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली खल्वायननं ताकदीनं सादर केलं. दीदीच्या भूमिकेत अभिनयकौशल्य पणाला लावणाऱ्या शमिका जोशीनं व्याकुळता, उत्कटता, कल्पनारम्यता यांचं भावदर्शन सुरेख घडवलंय. सुरेशची भूमिका करणाऱ्या हेरंब जोगळेकरांचा रागदारीचा अभ्यास, बेबीच्या भूमिकेतून दीप्ती कानविदेनं प्रकट केलेली तडफ आणि सर्वच कलाकारांनी केलेला नेटका अभिनय या गोष्टींनी नाटकाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय! 


Sunday, November 18, 2018

रस्ते सुरक्षेचा संदेश देण्यासाठी उत्साहात दौडले रत्नागिरीकर


मोटार वाहन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. पण वाहन वापरतना पुरेशी काळजी घेणं, इतर रस्ते वापरणाऱ्यांबाबत सौजन्याने वागणं आणि पर्यावरणाची जपणूक करणं यादेखील तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा संदेश वाहनं आणि रस्ते वापरणाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'महावाकथॉन  २०१८ ' ही भव्य प्रभातफेरी रविवार दि १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यभर राबविण्यात आला. रत्नागिरी येथील शेकडो नागरिकांनी या उपक्रमात आपला उत्सफूर्त सहभाग नोंदविला.  
रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश आर एन जोशी 
सकाळी आठ वाजत रत्नागिरी येथील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या प्रांगणात जमलेल्या शेकडो सुरक्षाप्रिय नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायाधीश आर एन जोशी यांनी हिरवा झेंडा दाखविताच प्रभातफेरीचा प्रारंभ झाला. त्यावेळी सह जिल्हा न्यायाधीश श्री. बिले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांसह विविध कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
अध्यक्षीय भाषण करताना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण , उपस्थितांत डावीकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण,
आरटीओ कार्यालयापासून रत्नागिरी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ही प्रभातफेरी औद्योगिक क्षेत्रासमोरून दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर प्रवेशद्वारातून शहरात प्रवेशली. तेथील जलतरण तलावाशेजारील प्रांगणात उभारलेल्या व्यासपीठावरून मान्यवरांनी 'रस्ता सुरक्षा- हॉर्न नको-जबाबदार ड्रायविंग' असा संदेश दिला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले. वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या चालकांचे पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधून घेणे हा या उपक्रमामागील एक उद्देश असल्याचे ते म्हणाले. एस टी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे प्रभारी नियंत्रक विजयकुमार दिवटे यांनी प्रचंड संख्येने प्रवासी वाहतूक करताण सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचे काम महामंडळ करत असल्याचे सांगितले. रस्ते अपघातांतील बळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगून अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी यासंदर्भातील आकडेवारी सादर केली.
प्रभातफेरीत सहभागी झालेले एस टी कर्मचारी 
 अपघातांचे प्रमाण कमी करायचे असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक प्रबळ केली पाहिजे असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या  अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. परदेशातील वाहतुकीचे आपण केलेले निरीक्षण नमूद करून स्वयंचलित वाहनांचावापर कमी करणे, पादचार्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे तसेच रस्त्यावर सौजन्याने वागणे या गोष्टीची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. कोकणातील वळणावळणाच्या रस्त्यांवरून सुरक्षित प्रवासी वाहतूक करणाऱ्या एस टी बस चालकांचेही जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले

वाहतूक
पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूरसंचालन 'मोटार जगत'चे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.
पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविल्यानंतर चहापान होऊन कार्यक्रमाची  सांगता झाली.
(छायाचित्र सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी  )


Tuesday, October 16, 2018



कवयित्री भामिनीसखा यांचे निधन 

मंडणगड येथील डॉ एस एस मसुरकर मेमोरियल ट्रस्टच्या प्रवर्तक आणि कवयित्री भामिनी सखाराम मसुरकर यांचे रविवार दिनांक १४ ऑक्टोबर २०१८ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. भामिनीसखा या नावाने त्या कविता व मुलांसाठी गोष्टी लिहीत. 'कुसुमांजली' या नावाने त्यांच्या काही कविता २०१५ मध्ये प्रकाशित झाल्या होत्या. प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनातून बचत करून त्यांनी आपले दिवंगत परोपकारी पती डॉ सखाराम सावळाराम मसुरकर यांच्या स्मरणार्थ ट्रस्ट स्थापन केला होता. त्या माध्यमातून मंडणगड व रत्नागिरी येथे समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. www.drmasurkartrust.webs,com


भामिनी मसुरकर या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातून प्राथमिक शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीची संख्या या विषयावरील त्यांच्या शोधनिबंधाला एनसीईआरटी या संस्थेकडून पारितोषिक मिळाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी कविता रचण्यास प्रारंभ केला. ईशस्तुती, शालेय कार्यक्रम, थोर व्यक्तींचे जीवन दर्शन, निसर्ग वर्णन इत्यादी विषयांवरील त्यांच्या कविता गेय आणि वृत्तात रचलेल्या असत. त्यांच्या अनेक कविता व बालकथा दैनिके व मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत.  'कुसुमांजली' या नावाने त्यांच्या कवितासंग्रहाचा पहिला भाग कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे माजी अध्यक्ष डॉ दिलीप पाखरे  यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेसह प्रकाशित झाला होता.

मंडणगड येथील डॉ चंद्रशेखर मसुरकर, 'मोटार जगत'चे संपादक व ज्येष्ठ स्तंभलेखक राजेंद्रप्रसाद, सुरक्षा अधिकारी मिलिंद, पोलीस अधिकारी शुभेंद्रप्रसाद  हे पुत्र ज्येष्ठ परिचारिका सौ विद्या, आशा, मुग्धा आणि सुदर्शन या स्नुषा तसेच निर्मला (प्रतीक्षा ) अरुण कुबल,  भारती आणि सौ. उज्ज्वला पराडकर या कन्या व जामात आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.




कोंकणच्या मुळावर उठणा ऱ्या सहा पदरी सागरी मार्गाची खरेच गरज आहे काय ? उत्तरं देण्यासाठी सरकार बांधील आहे. कोंकण किनारपट्टीजवळून जाणाऱ्या सा...